आभाळभर ओलं…
ह्रदयात खोल..
सर तुझीच….
बेभान वारा..
देहभान सारा..
सय तुझीच..
राहीलेला गारवा
कुणी छेडी मारवा..
सल तुझीच..
– अखिल जोशी
by Akhil Joshi
आभाळभर ओलं…
ह्रदयात खोल..
सर तुझीच….
बेभान वारा..
देहभान सारा..
सय तुझीच..
राहीलेला गारवा
कुणी छेडी मारवा..
सल तुझीच..
– अखिल जोशी
तू असताना “कळतो” पाऊस
तू नसताना “छळतो” पाऊस
निरोप घेऊन मागे वळता
गालावर ओघळतो पाऊस
थेंब झेलती फुले सुगंधी
पानावर सळसळतो पाऊस
दूर डोंगरावरी सयींच्या
धबाधबा कोसळतो पाऊस
चाल ऐकुनी चाहूल देतो
पैंजणात घुटमळतो पाऊस
तुझा रेशमी स्पर्श होऊनी
क्षणामध्ये विरघळतो पाऊस
तुला बिलगता वीज होऊनी
माझ्यावर कोसळतो पाऊस
निळी निळाई आभाळी
एक रंग तो सांभाळी,
मेघ सावळे दाटून येता
इंद्रधनु त्याच्या भाळी
लवकर पाऊस यावा असा माझा हट्ट नाही
तसं माझं पावसाशी नातं काही घट्ट नाही
उजाड झालाय उजेड, काळोखही मिट्ट नाही
उनाड वारा एसीत बंद, हौस माझी फिट्ट नाही
एक होती बाग, होते बोलणारे
एक होते फूल जे की डोलणारे
येत होते, जात होते सांगणारे
गंध त्याचा “फार” होते झेलणारे
— अखिल
पावसा ये कमिंग सून
अस म्हणत आला जून
कौलाने पाहिले चपापून
झाडून घेऊ आहे तो उन
लहरी जरी आहे मान्सून
वाट पाहतो मनापासून. .
सरी तुझ्यातून माझ्यातून..
तशाच कागदी होडीतून
सूर्यच गेलाय पार वितळून
शोधतोय ढगांची एखादी खुण
उदास उदास मनातून.
हिरवी लहर एक आतून
तुझ्यासाठी ठेवली जपून.
एक जुनी आवडती धून ..
रोज रोज वाटते उठून.
आजतरी येशील, घेशील बसून.
तुझ्यातले माझ्यातले.
क्षण हसरे घेशील साठवून …
येशील ना पुन्हा परतून.….
नाहीतर निघून जाईल जून
– अखिल
ए पावसा ,
आलाच आहेस तर ये…
जरा बसून घे.. तुझ्यासाठी मस्त
गरमागरम आल्याचा चहा टाकते…
पावूस—
‘नको… मी असा कुणाच्या घरात बिरात जात नाही..
मुक्काम तर अजिबात करत नाही कुणाच्या घरात…
मला यायचा असत तुमच्या मनात..
घरात येऊन काय करू?
मनात आलो कि तुरटी सारखा मी फिरतो
तुमच्या मनातून…
कुठल्याही प्रवास कंपनी अशी सहल आयोजित करत नसेल
अशा प्रदेशातून मनमुराद फिरतो..
ढवळून निघते तुमचे मन..
कधी सुख होते द्विगुणीत…
कधी दु:ख होते ताजे… पण वाटते हलके नक्कीच…
तर असा माझा प्रवास मनातून मनातला…
कशाला उगाच घरी मुक्कामाला बोलावता?
ज्या घराची दारं नसतात बहुतांशी उघडी…
खिडक्या वारा यावा म्हणूनच उघडल्या जातात क्वचित…
नाहीतर डास येतात म्हणून बंदच असतात
आतमध्ये गुड नाईट चा सुगंध घेत तुम्ही झोपी जाता
बाहेरच्या रातराणीचा सुवास सोडून..!!
नक्कीच कळतंय मला
तुमच्या मनात सलतात सगळ्या गोष्टी…
एक काम करा..
मला तुमच्या घरात न बोलावता….
तुम्हीच मला भेटायला बाहेर या…
मनसोक्त भिजा. आनंद लुटा
या क्षणभंगुर जीवनात.. असे क्षण निर्माण करा…
कि तुम्हाला आयुष्य हिमालयासारखा वाटेल…
हे सगळ करत असताना
जरा सामाजिक जाणीव जागृत ठेवा…
इकडे तिकडे बाटल्या पडतील…
आणि त्या बाटल्यांमुळे तुम्ही पडाल
असे करू नका..
कारण बाटलीतल्या धुंदिपेक्षा…
निसर्गातील धुंदी कितीतरी चांगली आहे….
जगण्याची उमेद देणारी आहे..
जगण्याची उमेद देणारी आहे..
भलत्या सलत्या वेळी कधीही दाटून आलं
तरी बेल वाजवत नाही ते मळभ
पावसाचे भास मात्र देऊन जाते
भलत्या सलत्या वेळी कधीही आला
तरी बेल वाजवत नाही तो पाऊस
भिजवून मात्र जातो
भलत्या सलत्या वेळी कधीही आली
तरी बेल वाजवत नाही ती तुझी आठवण
भूतकाळ मात्र जागवते
भलतं “सलतं” तेव्हा कधीही येतो
तरी बेल वाजवत नाही तो राग…
किटली मात्र गरम करून जातो
भलत्या सलत्या वेळी डोळ्यात आला
तरी बेल वाजवत नहि… तो अश्रू
रडवून मात्र जातो
भलत्या सलत्या वेळी कधीही येतात…
तरी बेल वाजवत नाहीत ती तुझी स्वप्न
झोप मात्र उडवतात
कधी गेलं, कसं गेलं..कुठं गेलं बरं.
स्पंदनांच्यासह माझ्या हृदयाचं घर..
डाव मांडुनीया तू अडीच अक्षरांचा
जीवाला लावलीस अनोखी हुरहूर..
स्वप्नातून माझ्या जागा झालो खरोखरी
प्रत्यक्षात आली माझी स्वप्नातली परी…
आज नाही लागे डोळा माझ्या डोळीयांना ..
नजर खिळून राही टक्क भाळावर..
झोपेतच होतो इकडे, झोपेत तिकडे..
जळी, स्थळी, पाषाणी असे रूप तुझे खडे..
आरशात पाहता मी माझा चेहरा
तुझ्या गालाची खळी येते माझ्या गालावर..
भेट होता होते कसे काळीज सशाचे..
कोणी बोलायचे? अन उसासे श्वासांचे ..
नजरेला भिडे न नजर कुणाची..
अव्यक्त भावना व्हायची लज्जेनेच चूर..
जातानाही आणाभाका..पुढच्या भेटीच्या..
पुढच्या भेटीत नक्की बोलके होण्याच्या..
राहतो मी आता त्या स्वप्नांपासून दूर
हृदयाला मिळाले एक हक्काचे घर..!!
सांग सखे सांग … सांग सखे सांग
ओठ काही बोलती तू डोळ्यातुनी सांग
कधी तुझ्या मनी असा फुलला पिसारा…
कधी तुझ्या मनामध्ये वाहिला का वारा..
सांग सखे सांग … सांग सखे सांग
मन काही बोलू पाहे स्पंदनांनि सांग
दूर झालो कधी तेव्हा दाटले का मेघ
काळजीची उमटली का काळजात रेघ
सांग सखे सांग … सांग सखे सांग
कधी माझ्या आठवांनी ओळी झाली का
तुझ्या पापण्यांची रांग ?
सांग सखे सांग … सांग सखे सांग