ए पावसा ,
आलाच आहेस तर ये…
जरा बसून घे.. तुझ्यासाठी मस्त
गरमागरम आल्याचा चहा टाकते…
पावूस—
‘नको… मी असा कुणाच्या घरात बिरात जात नाही..
मुक्काम तर अजिबात करत नाही कुणाच्या घरात…
मला यायचा असत तुमच्या मनात..
घरात येऊन काय करू?
मनात आलो कि तुरटी सारखा मी फिरतो
तुमच्या मनातून…
कुठल्याही प्रवास कंपनी अशी सहल आयोजित करत नसेल
अशा प्रदेशातून मनमुराद फिरतो..
ढवळून निघते तुमचे मन..
कधी सुख होते द्विगुणीत…
कधी दु:ख होते ताजे… पण वाटते हलके नक्कीच…
तर असा माझा प्रवास मनातून मनातला…
कशाला उगाच घरी मुक्कामाला बोलावता?
ज्या घराची दारं नसतात बहुतांशी उघडी…
खिडक्या वारा यावा म्हणूनच उघडल्या जातात क्वचित…
नाहीतर डास येतात म्हणून बंदच असतात
आतमध्ये गुड नाईट चा सुगंध घेत तुम्ही झोपी जाता
बाहेरच्या रातराणीचा सुवास सोडून..!!
नक्कीच कळतंय मला
तुमच्या मनात सलतात सगळ्या गोष्टी…
एक काम करा..
मला तुमच्या घरात न बोलावता….
तुम्हीच मला भेटायला बाहेर या…
मनसोक्त भिजा. आनंद लुटा
या क्षणभंगुर जीवनात.. असे क्षण निर्माण करा…
कि तुम्हाला आयुष्य हिमालयासारखा वाटेल…
हे सगळ करत असताना
जरा सामाजिक जाणीव जागृत ठेवा…
इकडे तिकडे बाटल्या पडतील…
आणि त्या बाटल्यांमुळे तुम्ही पडाल
असे करू नका..
कारण बाटलीतल्या धुंदिपेक्षा…
निसर्गातील धुंदी कितीतरी चांगली आहे….
जगण्याची उमेद देणारी आहे..
जगण्याची उमेद देणारी आहे..