एक थेंब…एक ..!!

समिंद्राला उधाण.. लाटा सुटती बेफाट….

सोबतीला आला त्यांच्या वारा सुसाट…

लाटेवरी स्वार झाली तुझी याद अफाट 

एक थेंब डोळ्यामंदी …एक थांबला व्हटात   …!!

तुझ नसणं

पाहिले तुला ज्या नजरेने…

ते भरले अश्रुने आता…
गहिवरले मन..जे
तुझ्या भेटीने भारावले होते….
स्पर्श हाताचा…आठवतो…
रिक्त ओंजळी पाहताना..
बोथट झालेल्या संवेदना हि
टोचत राहतात रात्री जागताना…
विरहाचा माग काढता  काढता …
भेटते आपली पहिले भेट….
पहिल्या भेटीपासून पुन्हा आतापर्यंत 
पुन्हा होते…विरहाची भेट….
आणि तुझ नसणं … असणं  होऊन जातं..
रडायच्या ऐवजी हसणं होऊन जातं…

कधी कधी…

कधी कधी ….
तू वाटतेस मजला सूर छेडलेले…
अंतरात माझ्या या..थेट भिडलेले…
कधी कधी…
तू सांगतेस मजला शब्द गुंफलेले..
शब्दात गूढ होते अर्थ दडलेले…
कधी कधी
तू शोधतेस मजला. दूर दूर जेथे…
गवसेन का मी ग तुज आरपार तेथे..
कधी कधी…
तू संग न जरी या आसपास असशी…
डोळे मिटूनही मज स्पष्ट स्पष्ट दिसशी …
कधी कधी…
तू जे दिले ते मी… जपले उरात तैसे…
उमले मनात आता विरहाचे फुल जैसे

काहीतरीच होते…

बोलायचे एक…बोलून जातो काही…
भावनांचे असे हे काहीतरीच होते…

हलके करू म्हणालो… दु:ख साठलेले
शोधूनी ओंजळीला भार उरीच होते…

सांभाळ तू स्वत:ला …सुटला मंद वारा
तुझिया बटा छेडणे हे …स्वाभाविकच होते…

हे थेंब पावसाळी…शिरती मनात सहजी…
तू लज्जेत चिंब न्हाणे हे साहजिकच होते.

“झिंगणे”…

सावरणे म्हणजे तुझाच आधार शोधणे…
तुटलेल्या जीवाला…तुझ्या स्मृतीने बांधणे…

तू संग ना…तरी रंगले चांदणे…
मृदू मुलायम तरल संथ..गोंदणे…

राहिले तसेच स्वप्न ना उरले जगणे…
मागिले उगाच जे ना देता आले मागणे…

सोडूनी पाश सारे..बरे नव्हे हे वागणे…
तुझ्या वाटेवरी तेल नयनी जगणे…

वळूनी पुन्हा पाहतो वळणाकृती ती रिंगणे…
अनुभवावे तुझ्यासवे मद्यापरी ते “झिंगणे”…

आले कसे कोठुनी

आले कसे कोठुनी.. मेघ हे दाटुनी
येताना हिरवाईला थेंब थेंब वाटुनी…
मृद्गंध हा दरवळला…पाकळ्यात कसा विरघळला
घ्यावे क्षणास आता हृदयात साठ्वूनी…

सापेक्ष

आभास पालवीचे… नव्हते खरे कधीच…
ओळखिले नव्हते त्या फांदीने कधीच…
तो वृक्ष रुक्ष झाला… घरटे गवाक्ष झाले..
जगणे अधांतरीचे… कसे सापेक्ष झाले…