एक थेंब आला… थेंब अजुनी एक आला…
बघता बघता त्याचा पाऊस जाहला ..
ओलसर आठवणींची…शाल पांघरून मनी…
आणि गेला अलगद हिरवळ अंथरून अंगणी
एक थेंब..!
Posted in कविता
.व्यक्त व्हावे काय .?
कोण्या एका क्षणी त्याची तिची भेट
बोलायचे नाही …नजरा नजर थेट…
काजळाची रेषा … पापण्यांची दिशा …
तुझे ओठ बोले … मुकी मुकी भाषा ..
कुठला सवाल होता… उत्तराचा प्रश्न होता..
सांगू नयेच काही…ऐसा रिवाज होता…
ऐकायचे काय…बोलायचे काय…
सांगायला नाही …व्यक्त व्हावे काय .?
Posted in कविता
तू, मी अन तो…
ऊन आलं, मग मळभ आलं..
मळभ आलं.. मग ऊन आलं
कसला चालला आहे का खेळ…
तू कशाला लावतोस यायला इतका वेळ.
तुला कळत नाही ….. मलाही काम आहेत रे.खूप…
तू येणार म्हणून रोज वाळवण लवकर उचलून ठेवते मी….
उचलली कि मळभ निघून जाते.. आणि तू … येताच नाहीस…
इतका कशाला भाव खातोस…
माहितेय न?
तू येणार, तू आलास म्हणून लोक तुझ कौतुक करतील…
पण प्रचंड पडलास किवा पूर आणलास, लोकांची दैना उडवलीस
कि हीच लोक तुला शिव्या देतील….
मी मात्र मनमुराद तुझ्यामध्ये भिजेन..
गच्च चिखलावरच्या हिरवळीसारखी सजेन..
तू येतोयस न आता? बघ चहा करायची थांबलेय मी…
तू यायच्या आधीच्य उकाड्याने ओथांबलेय मी..
त्याचा फोन हि येवून गेला…म्हणाला….
एकत्र पावसात भिजायचं न?
मी त्याला म्हणाले येतेच..
पण मला न खर तर त्याच्याकडे जात असतानाच तुझ्याबरोबर भिजत जायचंय
…मग ये न…
तुला अगतिकता कळतच नाही माझी… आणि उगाच गडबड करू नकोस येताना
तुझी माझी भेट झाली हे कुणाला कळलं नाही पाहिजे…..
माझ मन भिजवणारा नक्की कोण… तू कि तो…
कुणालाच कळलं नाही पाहिजे…
मध्ये कॉफी वाफाळती… तिकडे तो आणि इकडे मी….
दोघांच्यात चाललेला निशब्द संवाद… आणि
खिडकीच्या गजांना तुझ्या येऊन गेल्याने चिकटलेला गारवा….!!
Posted in कविता
आलाच नाहीस…
आलाच नाहीस…
अरे तू येणार म्हणून आधी तू काळोख करतोस..
आधी वा-याला धाडतोस
मग गारवा वगैरे निर्माण करतोस…..
झाडं, पानं, हलायला लागली कि जरा वेग वाढवतोस…
सळसळ पानाच्या फांद्या झुकायला लागतात…
आणि मग वा -याचा वेग प्रचंड वाढतो…
पानं गळतात फांद्यांचे बारीक तुकडे पडतात पत्र्यांवर…
पत्रेही जरासे उडू लागतात ….
तडतड आवाज होतो….
तुझी चाहूल लागते..
पण काय होते कुणास ठाऊक …
तू येत नाहीस….
तुझ हे अस किती दिवस चालायचा?
तू येणार म्हणून कित्ती कविता झाल्यात तुझ्यावर..
तू यायच्या आधीच….
तू आला नाहीस जमिनीवर….
पण तू धबाधबा कोसळतो आहेस facebook वर
तू जमिनीवर यायलाच हव….. कारण..
या जमिनीवर जसा सुगंध जन्मतो ना….
तसा नाही जन्मत….facebook वर
Posted in कविता
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…
वा-याची सुरु झाली ढगांशी लढाई…
चमकत चमकत आली वीजबाई..
हृदयाच्या स्पंदनांचा वाढला वेग..
आकाशात चमकली जेव्हा एक रेघ..
टप टप पडताना थेंब होती मोठे..
पावूस येता जोराचा नाणे झाले खोटे..
आता वाहे झुळूझुळू पाणी नाल्यातून..
आठवणी तरंगती कागदी होडयातून…
मन आणि पावसाचे नाते ताजे ताजे ..
पागोळीच्या पैंजणाचे थेंब कसे वाजे
राहतो गारवा आता इथे तुझ्याविना…
तुझ्या आठवांचा ठेवून खजिना…
पुन्हा ये ना जरा तुझी सर सर घेवून.
घटट मिठी मार ना रे धरतीला बिलगून..
तुझे आणि जमिनीचे नाते कसे भारी..
झेलते ग भूमी तुझ्या सगळ्याच सारी…
जातानाही तू जेव्हा जाशील निघून ..
पुन्हा परतायचे वचन देवून…
जाशील तेव्हा तुझे थेंब घेवून जाशील…
डोळ्यामध्ये आमच्या थेंब ठेवून जाशील…
तू येशील तू येशील
तुझी वाट आम्ही पाहू..
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…
Posted in कविता
स्पर्श तुझा…
स्पर्श तुझा…
व्हायच्या आधी… विजा अंगावर आल्यासारख्या येतात…
जणू तुझा गगनातील विरह त्यांना सहन होत नाही…
जमीन हि तापलेली…तिचा तुझा विरह संपण्याचे वेध लागलेत…
हळूहळू एक मृत्तिकेचा मधुर गंध सुटलाय… तुझ्या स्पर्शाने…
स्पर्श तुझा…
आता अलगद अलवार… रुजतोय….
तू नसूनही तू येणार …….तू येणार..
आणि असाच भिनणार अंगांगात…
चिंब चिंब करून…
पागोळीचे थेंब जसे राहतात लटकत लटकत
मनातल्या दिशा जशा जातात भटकत भटकत…
स्पर्श तुझा…
कोसळल्या धारांनी होतो…
घोंगावणा-या वा-यांनी होतो…
अलगद झोम्बणा-या गारव्याने होतो..
गारठलेल्या गात्रांना वाफाळलेल्या कॉफीने होतो…
स्पर्श तुझा आनंदात तसा
स्पर्श तुझा दु:खातही होतो…
आनंद द्विगुणीत करणारा होतो..
दु:ख ताजेतवाने करणारा होतो..
स्पर्श तुझा….
कधी तिच्यामार्फत होतो…
कधी तिच्या आठवणीतून होतो….
स्पर्श… म्हणजे हर्ष.. म्हणजे
जणू आपल्या नात्याचा परामर्श…
Posted in कविता
तू येतोस,
तू येतोस, तू जातोस…
तू दिसतोस. तू रुजतोस..
तू भिजवतोस… तू लाजवतोस.
तू चार महिने येतोस…. आणि
आठ महिने आठवतोस …
मोराला नाचवतोस
आम्हाला श्रावणात नेतोस…
सणांचा आरंभ करतोस..
येतोस गाजत…गाजत जातोस…
तरी सांगू…
धरतीला भेटून
तुही रुजतोस…
धरती जाते हिरवळीने सजून…
जसा वारा पानात शिरतो लाजून…
Posted in कविता
तो गेल्यावर …..
तो गेल्यावर …..
अजुनी दरवळतो वास मातीचा…
जमीन आणि पावसाच्या प्रीतीचा.
तो गेल्यावर ……
थेंब ओघळती तारांवरुनी…
स्पर्शात राहतो वारा अजुनी…
तो गेल्यावर …..
एक नितांत सुंदर हिरवळ
मनात पसरलेली..
आठवणींची लांब रांग
धुक्यावर पहुडलेली
तो गेल्यावर …..
तो यायची वाट बघत…
मन आतुरतेने वाट बघतं…
डोळ्यात पाऊस उभा राहतो
तो येईल अशी अशा असतेच रोज..
येतानाचा दिमाख नेहमीच नसेलही..
पण सरींची लय
त्याच्या लहरीपणासारखीच ..
पैसा खोटा पाऊस मोठा ….
या लहानपणाच्या गाण्यासारखीच…
Posted in कविता
परवलीचा शब्द
आपुला परवलीचा शब्द हाच आहे
शरीर असे भिन्न जरी श्वास एक आहे.
येशी भेटायला तेव्हा संथ तुझी चाल ग
जाता सोडुनिया हात त्वरा त्वरा होई ग
असे जरी होते तरी भेट तीच आहे
दिन जरी भिन्न भाव तोच आहे.
वारा येई तुला देई स्पर्श त्याचा धुंद ग
पुनवेला आकाशात चांदणे स्वच्छंद ग
अशा वेळी ध्यानी मनी स्वप्न तेच आहे
निपचित डोळ्यामध्ये झोपतेच आहे..
Posted in कविता
प्रेमभंग..
तुझे रूप पाहण्यात
होतो मी ग दंग..
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..
तुझे स्मित हास्य I मला ‘गुगली’ होता…II
अन तिरपा कटाक्ष I तो ‘दुसरा’च होता…II
स्वप्नात तूच ग असशी..
ध्यानी मनी तूच दिसशी…
मी तुला पहिले असता…
तुझ्या मागे मागे आलो..
डोळ्यावर येत किरणे..
जरा जागा जागा झालो..
होता स्वप्नाचा त्या भंग..
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..
तुझी मोरचाल I करती माझे ग हाल .II
तुझे ओठ बंद I करती लाखो सवाल …II
तुज बघणे अन तुज पूजणे
हा नित्यक्रम रोजचा..
तू समोर येत माझ्या
माझी बंद होते वाचा..
तुला लावे मी जेव्हा फोन
तू उचलत नाहीत त्याला..
नुसतीच वाजते रिंग
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग
मनाचिये दारी I किती संकल्प केले II
तू येत समोरी I ते गोंधळून गेले II
तू मनात ‘घर’ या केले
मी मनात ‘पक्के’ केले..
तुज गाठून सांगावेसे
ओठात अडकुनी गेले..
योगायोग काय असावा
तू म्हणालीस मज सॉरी
तेव्हा तिकडून आली तुझ्या
प्रियकराची स्वारी
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..
मनाशी बांधली खुणगाठ I तुझ्याशीच बांधावी लग्नाची गाठ…II
जेव्हा तू फिरवलीस पाठ I तोच माझा प्रेमभंग क्रमांक आठ…II
Posted in कविता

ताज्या प्रतिक्रिया